आ. विजयसिंह पंडित विधानसभेत प्रश्न मांडणार

बहुचर्चित वाळू घोटाळा: तहसिलदार खोमणेंवर आज कारवाईची शक्यता
गेवराई, दि. 8 ( वार्ताहर )गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर सुरू असलेल्या बहुचर्चित वाळू घोटाळ्याचा पर्दाफाश आ. विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तहसिलदार संदीप खोमणे यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. याबत गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित हे आज विधानमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार आहेत. त्यामुळे तहसिलदार संदीप खोमणे यांच्यावर आज कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राक्षसभुवन वाळू घोटाळ्यात 20 हजार ब्रास अतिरिक्त वाळू उपसा झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या चौकशीतून समोर आले आहे. पंचनामा, ई-टीपी मोजणी आणि 4 पथकांनी केलेल्या कारवाईत अनेकजण दोषी आढळले आहेत. याप्रकरणी 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, सर्व आरोपी सध्या फरार आहेत. काहींनी अटकपूर्व जामिनासाठी बीड जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
तहसिलदार संदीप खोमणे यांना मंत्री दत्तात्रय भरणे यांचे अभय असल्याचा आरोप होत आहे. आज विधानमंडळात हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर खोमणे यांच्यावर कारवाईची अपेक्षा आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित करत आहेत. “कुठल्याही परिस्थितीत या घोटाळ्यातील कुणालाही सोडणार नाही” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.



