जिल्हाधिकारी अविनाश पाठकांचा भूसंपादन घोटाळा

जिल्हाधिकारी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
बीड, दि. 15 (वार्ताहार): 73 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची 7 दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यानंतर त्यांची बीड येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
पोलिस कोठडीत महत्त्वाचे पुरावे आणि धागेदोरे मिळाले असल्याची सूत्रांची माहिती आहे. पाठक आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती व त्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर आहेत.
पाठक यांच्या लातूर येथील निवासस्थानी 2 तासांपेक्षा जास्त काळ झाडाझडती घेऊन लॅपटॉप, टॅब आणि मोबाइल असे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. या वस्तू फॉरेन्सिक तपास आणि डेटा मिळवण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आल्या आहेत.
भूसंपादन मोबदला घोटाळ्याशी संबंधित एकूण 154 संचिकांपैकी 148 फाईल्स पोलिसांच्या हाती लागल्या असून 6 संचिका गहाळ आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या 3 फाईल्स अत्यंत महत्त्वाच्या असून, त्या न्यायाधीशांकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. 241 कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप असून, त्यातील 73 कोटी वितरित केल्याने गुन्हा नोंद आहे.
पाठक यांची मालमत्ताही आता रडारवर आली आहे. घोटाळ्याच्या काळात त्यांच्या खात्यांवर अथवा कुटुंबीयांच्या खात्यांवर काही संशयास्पद व्यवहार आहेत का, याचीही पडताळणी केली जात आहे. भूसंपादनाचे सर्व बनावट आदेश पाठक यांनी स्वतःच्या लॅपटॉपवरूनच तयार केल्याचा युक्तिवाद तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसपी व्यंकटराम व अधिकाऱ्यांचे पथक याबाबद पुढील तपास करीत आहे.



