वाळूच्या ७ हायवांवर अपर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

आमदारांनी तक्रार करताच झोपलेल्या प्रशासनाला जाग; चकलांबा ठाणेदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
गेवराई, दि. ७ (वार्ताहार): चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील राक्षसभूवन येथे घरकूलच्या नावे सुरू असलेला अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करावा, अशी मागणी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी केल्यानंतर झोपलेल्या प्रशासनाला खडबडून जाग आली.
बीडचे अपर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक यांनी राक्षसभूवन येथे धाड टाकून ७ हायवांवर कारवाई केली. सदरचा मुद्देमाल त्यांनी चकलांबा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
गेवराईत गेल्या काही दिवसांपासून पोलिस व महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षाखाली १०० कोटींचे सिंडीकेट सुरू असल्याचा आरोप आमदार पंडित यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतरच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी याविषयी गंभीर दखल घेतली.
“एवढ्या दिवसांपासून हा अवैध उपसा सुरू असताना सपोनि इंगळे काय करत होते?” असा सवाल उपस्थित होत आहे. राक्षसभूवन परिसरात अपर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक यांनी बीडवरून येऊन स्वतः कारवाई केली. मात्र चकलांबा पोलिसांना याची खबरही नव्हती. अखेर अपर जिल्हाधिकाऱ्यांनीच पोलिसांना बोलावून सदरची कारवाई पार पाडली.


