ठराविक मंडळी वाळू घोटाळ्यात जबाबदार, ९० कोटींचा दंड प्रस्तावित

जिल्हाधिकारी सुनावणीत मोठे खुलासे, तहसिलदारांवर गंभीर आरोप
गेवराई दि. १३ (वार्ताहर) – गेवराई तालुक्यातील वाळू घोटाळा प्रकरणाने आता राज्यस्तरावर लक्ष वेधून घेतले आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत अनेक कर्मचाऱ्यांनी मोठे खुलासे केले असून, ठराविक मंडळींना सोबत घेऊन तहसिलदार संदिप खोमणे यांनी हा घोटाळा केल्याचे समोर आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
राक्षसभूवन येथे घरकूल धारकांच्या नावे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या तपासात सुमारे २० हजार ब्रास अतिरिक्त वाळू उपसा झाल्याचे उघड झाले आहे. या उपशासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती.
या प्रकरणी ५० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. १२ जूनच्या सायंकाळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची स्वतंत्र सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान काही कर्मचाऱ्यांनी तहसिलदार संदिप खोमणे आणि त्यांच्या निकटवर्तीय कर्मचाऱ्यांनी मिळून हा घोटाळा केल्याचे लेखी स्वरूपात सांगितले. त्यामुळे तहसिलदारांच्या निकटवर्तीय कनिष्ठ अधिकाऱ्यांची नावेही जिल्हाधिकाऱ्यांसमोर उघड झाली आहेत.
घोटाळ्यात सहभागी असलेल्या वाहनांवर सुमारे ९० कोटी रुपयांचा दंड लावण्याची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता आहे. तहसिलदार संदिप खोमणे यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या निलंबनाची शिफारस करून राज्य सचिवांकडे प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्पष्ट केले.

