तलाठ्याला धक्काबुक्की करून दोन ट्रॅक्टर पळवले

गेवराई व चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत वाळू माफियांची दादागिरी
गेवराई, दि. 27 (वार्ताहार): गेल्या काही दिवसांपासून चकलांबा व गेवराई पोलीस ठाण्याचा कारभार वादग्रस्त ठरत असून, स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्थानिक ठाणेदारांची कानउघाडणी केल्यानंतरही येथे वाळू माफियांची दहशत कायम आहे. हिंगणगाव परिसरात दोन अनधिकृत वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला धक्काबुक्की करून वाळू माफियांनी दोन्ही ट्रॅक्टर गोंदी,मार्गे पळवले असल्याची घटना आज, दि. 27 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, गेल्या दोन महिन्यांपासून चकलांबा व गेवराई पोलीस प्रशासन आणि ठाणेदार सचिन इंगळे व ईतर वादाच्या भोवऱ्यात आहेत. पदभार स्वीकारल्या पासून अल्पावधीतच वाळू माफियांशी ‘सूत्र जुळवून घेणारे ठाणेदार’अशी त्यांची ख्याती झाली आहे. चकलांबा पोलीस ठाण्याची हद्द अवैध धंदे आणि अनधिकृत वाळू उपशाचे केंद्र बनली आहे.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्वतः अवैध धंद्यांबाबत ठाणेदारांना कडक सूचना दिल्या होत्या. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता या हद्दीत अनधिकृत वाळू उपशाचा जोर वाढतच चालला आहे. आज आपले कर्तव्य बजावत असताना गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील हिंगणगावच्या स्थानिक तलाठ्याला धक्काबुक्की करून वाळूने भरलेली दोन ट्रॅक्टर वाहने वाळू माफियांनी पळवली.
वाळू उपसा रोखण्यासाठी पोलीस प्रशासन काय करतेय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिले असून, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.तसेच चकलांबा पोलिसांनी एक जेसीबी यांच्यावर देखील कार्यवाई केली असल्याची माहिती आहे.



