सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधून रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल – उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार
गेवराई, दि. 31(वार्ताहार ) नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने उभारण्यात आले 100 खाटांचे “शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल” हे रुग्णालय जनतेसाठी वरदान ठरेल. या रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार व उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल, असा विश्वास राज्याच्या उपमुख्यमंत्री ना. सौ. सुनेत्राताई पवार यांनी व्यक्त केला. हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजीमंत्री शिवाजीराव उर्फ दादा पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन शुक्रवार दि. 31 जुलै रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी माजीमंत्री शिवाजीराव उर्फ दादा पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, माजी आमदार भीमराव धोंडे, संजय दौंड, बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक न्याय सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे, भटके-विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड, बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, स्वप्निल गलधर, सचिन मुळूक, चंद्रकांत नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, आ. विजयसिंह पंडित, जगदंबा शिक्षण संस्थेचे सचिव जयसिंग पंडित, शारदा रुग्णालयाचे संचालक डॉ. अजय पंडित, रणवीर पंडित, पृथ्वीराज पंडित यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार म्हणाल्या, “शिवाजीराव पंडित परिवाराने गेवराई तालुक्यातील जनतेच्या आरोग्यसेवेसाठी अत्यंत सुसज्ज आणि आधुनिक रुग्णालय उभारले आहे. त्यामुळे आता परिसरातील नागरिकांना उपचारासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही. शारदा रुग्णालयाच्या माध्यमातून समाजसेवेचे मोठे कार्य घडेल, असा मला विश्वास आहे.”
प्रास्ताविकपर बोलताना माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सांगितले की, “स्व. अजितदादा पवार यांनी संस्थेच्या माध्यमातून आधुनिक रुग्णालय सुरू करण्याची संकल्पना व्यक्त केली होती. आज ती संकल्पना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते पूर्णत्वास येत आहे, मात्र या क्षणी अजितदादांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. ते आज आपल्यासोबत असते तर हा आनंद द्विगुणित झाला असता” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
“अजितदादांनी गेवराई तालुक्यासाठी 7 बॅरेज उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील पहिल्या टप्प्याला आज टाकळगाव (हिंगणी) बॅरेजच्या भूमिपूजनाने सुरुवात झाली आहे. या बॅरेजमुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन व पिण्याच्या पाण्याचा मोठा लाभ होणार आहे. उर्वरित बॅरेजही पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू” असेही माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार म्हणाल्या, “स्व. अजितदादा पवार यांनी समाजविकासाची जी स्वप्ने पाहिली होती, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. समाजहिताच्या कामांसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे राबवून आ. विजयसिंह पंडित यांना बळ देऊ” असेही त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी भीमराव धोंडे, ॲड. राजेश्वर चव्हाण, अनिल जगताप आणि कल्याण आखाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा प्रारंभ स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाला. श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या भाषणा दरम्यान उपस्थितांनी “अजितदादा अमर रहे” या घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच गेवराई शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



