गेवराईच्या राजकारणात बीआरएस पक्षाची जोरदार एंट्री

गेवराईच्या राजकारणात बीआरएस पक्षाची जोरदार एंट्री

मंत्री धनंजय मुंडे, अमरसिंह पंडितांचे निकटवर्तीय बाळासाहेब मस्केंसह शेकडो समर्थकांचा पक्षात जाहीर प्रवेश

गेवराई : दि १७ ( वार्ताहार ) राष्ट्रवादीत बंडखोरी करत धनंजय मुंडे यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या बंडाबाबत बक्षिस म्हणून त्यांना राज्याची कृषिमंत्रीपदही मिळालं. मात्र एकीकडे आनंद असताना धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे गेवराईतील निकटवर्तीय युवानेते बाळासाहेब मस्के यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकला असून त्यांनी गेवराई येथे रविवारी आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात बीआरएस पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. तसेच यावेळी तालुक्यातील अनेक गावातील माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी देखील या पक्षात प्रवेश केल्याने गेवराईच्या राजकारणात बीआरएस पक्षाची जोरदार एंट्री झाल्याने आगामी निवडणूकीत गेवराईतील राजकारणाला कलाटणी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बीआरएसचे खासदार बी.बी पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख माणिकराव कदम, राज्य समन्वयक बाळासाहेब सानप, राज्य महिलाध्यक्षा सुवर्णाताई साठे, बीड जिल्हा समन्वयक दिलीप गोरे, शिवराज बांगर, कुलदीप करपे आदींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभापती सविताताई मस्के, मयुरी खेडकर-मस्के यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्याचबरोबर तालुक्यातील रेवकीचे माजी सरपंच सुरेशराव सौंदरकर, हिंगणगावच्या माजी सरपंच इंदुबाई सदाफुले, सरपंच सुशीला गायकवाड, बागपिंपळगावचे सदस्य आकाश कोकरे, विष्णू गायकवाड, आंकुशराव मोरे, रुईचे माजी सरपंच गणेश घोंगडे, तलवाडा माजी सरपंच आर्जुन भांबरे, गोंदीच्या माजी उपसरपंच सुनीता गायकवाड, हिंगणगावचे माजी उपसरपंच बबनराव जाधव यांनी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसह बीआरएस पक्षात प्रवेश केला, या सर्वांचे स्वागत उपस्थित मान्यवरांनी केले. तर बाळासाहेब मस्के यांच्या पाठीशी भारत राष्ट्रीय समिती पुर्ण ताकदीनिशी उभा असेल असा शब्द यावेळी खासदार बी.बी.पाटील यांनी दिला. या प्रवेश सोहळा कार्यक्रमाला युवा नेते अजय दाभाडे, नानासाहेब पवार, भगवान सानप यांच्यासह तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला, नागरिक उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांचा आवाज होऊन काम करणार – बाळासाहेब मस्के

गेवराईतील प्रस्थापित भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतात, याविरोधात आवाज उठवला तर तो दाबला जायचा, हि मनाला खंत होती. शिवाय जिल्हा परिषदेत काम करत असताना जाणीवपूर्वक फंड पळवला जायचा. तर गेवराई तालुक्यात ऊसाला भाव नाही, वेळेवर त्यांना बीले दिली जात नाहीत, हि शेतकऱ्यांची सातत्याने पिळवणूक केली जात असल्याची बाब निंदणीय आहे. तरी यापुढे शेतकऱ्यांचा आवाज होण्यासाठी शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून मी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. जेथे कोणावर अन्याय होईल तेथे भक्कमपणे उभा राहिल असा शब्द उपस्थितांना देऊन आगामी विधानसभेत बीआरएस पक्षाचा झेंडा फडकणारच असा विश्वास बी.एम.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी प्रस्ताविकपर बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *