
मंत्री बँकेत ६२ कोटींचा नवा घोटाळा उघडकीस
खोटी कागदपत्रे देवून बँकेला फसवणार्या ३३ कर्जदारांना नोटीस
बीड, दि.२८ ( वार्ताहार )
द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह इतरांविरुध्द कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल झालेला असताना पुन्हा बँकेत ६२ कोटी रुपयांचा नविन घोटाळा उघडकीस आला आहे. अस्तित्वात नसलेल्या फर्मच्या नावाने बनावट कागदपत्रे दाखवून बँकेची फसवणुक करणार्या सुमारे ३३ कर्जदारांना बँकेचा विश्वासघात केल्याप्रकरणी बँकेने लेखी नोटीस दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व बनावट कर्जदार असून अध्यक्षांनी त्यांच्या नावाने कर्जव्यवहार केले असून प्रकरणातील दोषीविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बळवंत चव्हाण यांनी केली आहे.
द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेत बँकेचे अध्यक्ष सुभाष सारडा व इतरांच्या विरुध्द कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाखा येणे-देणे या नावाखाली मंत्री बँकेच्या विशिष्ट शाखेत चेक जमा करून तो न वटवता कोट्यावधी रुपये उचलून सर्वसामान्य ठेवीदारांच्या पैशाचा गैरव्यवहार अध्यक्ष, संचालक व अधिकार्यांनी संगणमत करून केल्याची बाब रिजर्व बँकेच्या तपासणीमध्ये उघड झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना आता मंत्री बँकेत अस्तित्वात नसलेल्या फर्मच्या नावाने सुमारे ६२ कोटी ८९ लाख रुपयांचे कर्ज उचल झाल्याची बाब उघडकीस आली आहे.
मंत्री बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते बळवंत चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, मंत्री बँकेत वेगवेगळ्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. ज्या लोकांना स्वतःच्या मालकीचे घर नाही अशा लोकांच्या नावाने वर्षानुवर्षे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक व्यवहार या बँकेने कोणाच्या आदेशाने केले? हे सर्व लोक बँकेचे अध्यक्ष सुभाष सारडा यांच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संबंधित आहेत, त्यामुळे हा सर्वसामान्य ठेवीदारांचा कोट्यावधी रुपयांचा निधी हडप करणार्या आणि गोरगरीबांच्या नावाने खोटे व्यवसाय दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलार्याविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिस प्रशासनासह सहकार विभागाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.बँकेच्या संदर्भात दाखल गुन्ह्यातील तपासासंदर्भातील ठोस पुरावे व काही कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेला देणार असल्याचे शेवटी बळवंत चव्हाण यांनी सांगितले.