श्री क्षेत्र नारायणगड महाराष्ट्राचे भक्तिरुपी शक्तिकेंद्र – ज्ञानेश्वर महाराज पठाडे
गेवराई : दि १ ( वार्ताहार ) महाराष्ट्रात सर्वत्र श्रीक्षेत्र नारायणगडाच्या मातीचा सुगंध दरवळत असून तेरा महान सिध्द ऋषीमुनींनी येथे साधना केलेली आहे. ती पावन भूमी आहे. संत कुलभूषण महात्मा श्री नगद नारायण महाराजांच्या भक्तीरुपी शक्तीने पंढरीचे पांडुरंग हे नारायणगडावर आलेले आहेत. ही भक्तीरुपी शक्तीची ताकद आहे. नगद नारायण महाराज थोर महात्मा तपस्वी साधू होते. त्यांच्या भक्तीरुपी सेवेचे तात्काळ फळ मिळते ही त्यांच्या नामाची ताकद आहे.महाराष्ट्राचे भक्तिरुपी शक्तिकेंद्र म्हणून श्रीक्षेत्र नारायणगडाचा उल्लेख होतो. अठरापगड जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेवून नारायणगड आईच्या भूमिकेत काम करतो. शक्तीसाठी रायगड आणि भक्तीसाठी नारायणगड काम करतो गडावर आजही साक्षात भगवंत हे वास्तव्य करत आहेत हि नगद नारायण महाराजांच्या सेवेची ताकद आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी केले.
स्वानंद सुख निवासी संत कुलभूषण महात्मा श्री संत नगद नारायण महाराज यांच्या कृपेने गेवराई तालुक्यातील मौजे उमापुर येथे मंगळवार दि.३१ मार्च रोजी श्रीक्षेत्र नारायणगडाच्या ७४ व्या भव्य नारळी सप्ताहास संत-महंतांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला दरम्यान यावेळी पहिले कीर्तनरुपी पुष्प गुंफताना सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पठाडे हे बोलत होते.यावेळी श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत प्रेममुर्ती ह.भ.प.शिवाजी महाराज, नामदेव म.शेकटेकर, उत्तराधिकारी संभाजी महाराज, शिवाजी म.गिरी, लक्ष्मण म.तकीक, हरि म.भोसले,शिवाजी म.भोसले यांच्यासह पंचक्रोशीतील महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी त्यांनी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पड़ता जड़ भारी | दासी आठवावा हरी ||१|| मग तो होऊ नेदी सीण | आड़ घाली सुदर्शन ||२|| नामाच्या चिंतने | बारा वाटा पळती विघ्ने ||३|| तुका म्हणे प्राण | करा देवासी अर्पण ||४|| या अंभगावर सुंदर असे चिंतन केले पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण करावे नामस्मरणाने संकट दूर होवून पुण्य प्राप्त होते. भगवंत भक्ताला संकटातुन बाहेर काढतात. जीवनात शांतीसाठी तुकोबांची गाथा वाचा एकमेकांना सहकार्य करा. पती-पत्नीने एकमेकांना आधार देत खंबीर साथ द्या. पैश्यामुळे भाऊ- भाऊचे नाते तोडू नका. स्त्री शक्तींवर टिका करु नका. त्यांना कमी लेखू नका. नारळी सप्ताहात चौवीस तास भजन आणि भोजन सुरु असते. महंत शिवाजी महाराज हे परिपूर्ण वारकरी आहेत सर्व समाजाला ते एकत्र घेवून चालतात. तर उत्तराधिकारी संभाजी महाराज हे तरुणांची फौज घेवून तरुणांची मोट बांधण्याचं काम करत आहेत. या भव्य नारळी सप्ताहात विचारांची देवाणघेवाण होते. आपल्यात काही तरी बदल व्हावेत यासाठी हा धर्म मंडप आहे. आठ दिवसांत काय प्रगती झाली हे महत्त्वाचे आहे. फिरता नारळी सप्ताह हा युवा शक्ती तरुणांना उपदेश देण्यासाठी आहे. आपल्या मंदिरांचे पवित्र्य आपण सांभाळा गावागावातील मंदिरे आपले धर्म केंद्र आहेत. तसेच संत हे ज्ञानाने ओळखा, तरुणांनो आपले भविष्य हे तळहातावर नसून मनगटातील बळात आहे. तरुणांनो लढायला शिका , सैनिकांचा आदर्श घ्या त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. जवान आणि किसान यांच्यावर देश चालतो आहे. त्यांच्याविषयी कायम कृतज्ञता दाखवा तसेच जन्मदात्या आई- वडिलांची सेवा करा असा मौलिक सल्लाही त्यांनी शेवटी बोलताना दिला. यावेळी नारायणगडाचे सर्व टाळकरी, वारकरी, गायक, वादक, चोपदार भजनी मंडळ तसेच सर्व भक्त परिवार व पंचक्रोशीतील महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या भव्य सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी उमापुर ,मारोतीचीवाडी आणि पंचक्रोशीतील भक्तगण मंडळी परिश्रम घेत आहेत. सर्वांच्या एकीने हा भव्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय याबद्दल ग्रामस्थांचे सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे.